मुंबई : मुंबईत दोन दिवस थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रीपासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मुंबईतल्या सायन, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, भायखळा या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मध्य रेल्वे दहा मिनिटे उशिराने धावते आहे. दक्षिण मुंबईतही पावसाच्या सरी कोसळत आहेत.
ठाणे, जोगेश्वरी, विक्रोळी या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.मध्य रेल्वेची सेवा दहा मिनिटे उशिराने सुरू आहे असेही समजते आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. मध्य रेल्वेची सेवा १६ तास बंद होती. तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम झाला होता. अनेक मुंबईकर पावसात अडकून पडले होते. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी काही सरी कोसळल्या. मात्र रात्रीपासून मुंबई आणि उपगनगरांमध्ये चांगलाच पाऊस पडतो आहे.नवी मुंबईतही पावसाला सुरूवात झाली आहे. ऐरोली, घणसोली, बेलापूर, खारघर या भागांमध्ये पावसाच्या सरी चांगल्याच कोसळत आहेत.